‘झोपडपट्टीतील लोक सोबत असतात, तेव्हा जिंकण्याची खात्री असते’ : गडकरी

मुंबई : पाेलीसनामा ऑनलाईन-हिंदू नववर्ष स्वागत समितीतर्फे एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ‘झोपडपट्टीतील लोक सोबत असतात, तेव्हा जिंकण्याची खात्री असते पण बुद्धिवादी सोबत लोक असले की जिंकण्याची खात्री नसते’ असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विधान केले आहे. ‘दी आयडिया ऑफ न्यू इंडिया’ या कार्यक्रमात बोलत असताना त्यांनी हे वक्तव्य केले.
यावेळी बोलताना गडकरी म्हणाले की, “राष्ट्रनिर्माण करणारा १०० वर्षांचा विचार करतो. आपण राष्ट्रवादी विचारांचे आहोत. हा देश सर्वसंपन्न व्हावा, शक्तिशाली ऐश्वर्यसंपन्न व्हावा हे आपल्या सगळ्यांचे स्वप्न आहे. पण या देशात विचारशून्यात ही मोठी समस्या आहे. no one can claim he is perfect, मी सुद्धा नाही. मीही अपूर्णांक, माझेच विचार योग्य असेही मी मानत नाही.” इतकंच नाही तर पुढे बोलताना ते म्हणाले की, “आपली लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. अशातच  निर्णय न घेणं ही सध्याची मोठी समस्या आहे. मी काही इंजिनियर नाही.” याशिवाय ” ज्यावेळी मुंबईतील उड्डाणपूल केले तेंव्हा वाटले होते वाहतूक समस्या सुटेल, पण गाड्या इतक्या वाढल्यात की समस्या अजूनही कायम आहे.” असंही ते म्हणाले.

हिंदू नववर्ष स्वागत समितीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘दी आयडिया ऑफ न्यू इंडिया’ या कार्यक्रमात उद्योजक श्रीराम दांडेकर, ज्येष्ठ पत्रकार डॉ. भारतकुमार राऊत, शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यवाह सुरेश देवळे, हिंदू नववर्ष स्वागत समितीचे कार्याध्यक्ष भूषण मर्दे, उपाध्यक्ष वीरभद्र दुलानी, कार्यवाह रमेश देवळे उपस्थित होते.