निवेदनात म्हटले की, शहरातील कचरा उचलण्याच्या मागणीबाबत आमचे दुमत नाही. मात्र, झाडलोट करणार्या कर्मचार्यांना अनावश्यकरित्या दोन वेळा काम देण्यास विरोध आहे. कामगारांच्या प्रश्नांबाबत व कामकाजाबाबत चर्चा करण्यापूर्वी अथवा निर्णय घेण्यापूर्वी कायद्यानुसार मान्यताप्राप्त असलेल्या कामगार संघटनेस चर्चेसाठी आमंत्रित करण्याचे कायदेशीर बंधन महापालिकेवर आहे. असे असतांनाही सदरच्या चर्चेत आमच्या संघटनेला सहभागी करुन घेण्यात आले नाही. कोणतीही पूर्वसूचना आम्हाला देण्यात आली नाही. राज्य शासनाने स्वीकारलेल्या लाड समितीच्या शिफारसी महापालिकेवर बंधनकारक आहेत. त्या महापालिकेने स्वीकारलेल्याही आहेत. लाड समितीने सफाई कामगारांना सकाळी सलगपणे एकपारगी म्हणजेच एकवेळ काम नेमून देण्याची महत्वपूर्ण शिफारस केलेली आहे. त्याला अनुसरुन तत्कालीन महापौर संग्राम जगताप यांच्याकडे आम्ही पाठपुरावा केला होता.
तत्कालीन महापौर जगताप, मनपा प्रशासन व युनियनच्या संयुक्त बैठकीत सकाळी एकवेळ काम नेमून देण्याची मागणी केलेली होती. त्याला अनुसरून तत्कालीन महापौर जगताप यांनीच सफाई कामगारांना एकवेळ साफसफाईचे काम नेमून देण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. त्यानुसार आजतागायत सफाई कामगारांना एकवेळ काम नेमून देण्याची प्रथा सुरू आहे. असे असतांना तत्कालीन महापौर जगताप यांचे आदेश एकतर्फी रद्दबातल ठरवून व लाड समितीच्या शिफारसींचा उघडपणे भंग करुन दोन वेळा साफसफाईचे काम नेमून देण्याचा बेकायदेशीर निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या बेकायदेशीर धोरणास युनियनचा विरोध असून लाड समितीच्या शिफारसींनुसार एकवेळ काम नेमून देण्याच्या मागणीसाठी 20 फेब्रुवारीपासून मनपा कामगारांचे बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशाराही लोखंडे यांनी दिला आहे.