मी नुकताच मित्राचा खून करुन आलोय….!

बंगळुरु : वृत्तसंस्था – सिनेमातील गोष्टी सत्य नसतात हे आपण सारेच जाणतो. तरीही अनेकदा सिनेमातल्या खोट्या गोष्टींसारख्या घटना समोर येताना आपण पाहत असतो. वरूण धवणचा बदलापूर हा चित्रपट सर्वांना परिचित असेलच. त्यात एक सिन आहे. एके ठिकाणी पोलीस नाकाबंदीच्या ठिकाणी वाहनांची तपासणी करत असतात आणि वरूण धवनला जेव्हा विचारलं जात की, दारू पिली आहेस का? तर तो उत्तर देतो की खून केला आहे. हा सीन जरी खोटा असला तरी असाच एक खराखुरा किस्सा समोर आला आहे. घटना वाचून नक्कीच तुम्हाला धक्का बसेल.
एका दुचाकीस्वाराला हेल्मेट न घातल्याप्रकरणी बंगळुरु पोलिसांनी थांबवलं. हेल्मेट न घालणाऱ्यांविरोधात कारवाई करणाऱ्या पोलिसांनी दुचाकीस्वार तरुणाला कागदपत्रं तसंच वाहतूक परवाना आणि दंड भरण्यास सांगितलं. तरुणाने रक्ताने माखलेला चाकू बाहेर काढला आणि आपण मित्राचा खून करुन आलो असल्याची कबुली दिली. तरुणाने दिलेले हे उत्तर ऐकून पोलिसांना धक्काच बसला. 12 नोव्हेंबरला संध्याकाळी 5 वाजता ही घटना घडली होती. 26 वर्षीय संदीप शेट्टी हा मुळचा उडुपीचा असून चिक्कलबुरा शहरात स्थायिक आहे. मित्र आणि व्यवसायिक भागीदार देवराज याच्यावर त्याने चाकूने वार केले असून सध्या तो रुग्णालयात दाखल आहे. त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
काय म्हणाला तरूण ?
‘मला माफ करा…मी नुकतंच माझ्या मित्राचा खून करुन आलो आहे आणि आत्मसमर्पण कऱण्यासाठी पोलीस ठाण्यात चाललो आहे’, अशी माहिती तरुणाने पोलिसांना दिली. तरुणाची कबुली ऐकल्यानंतर धक्का बसलेल्या पोलिसांनी त्याच्याकडून चाकू जप्त करत तरुणाला ताब्यात घेतलं आणि वरिष्ठांना माहिती दिली.
‘संदीपने रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी देवराजला 1 लाख रुपये दिले होते. देवराजने हे पैसे परत करण्यास नकार दिला होता’, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. संदीप आणि देवराज रिअल इस्टेट व्यवसायात भागीदार होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ‘दोन वर्षांपूर्वी संदीपने देवराजला पैसे दिले होते. त्यावेळी त्याने हे पैसे रिअल इस्टेटमध्ये गुंतवण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र त्याने तसं केलं नसल्याची माहिती मिळाल्यानंतर संदीपने पैसे परत मागण्यास सुरुवात केली होती’.