युवकाच्या हत्येनंतर जोरदार दगडफेकीसह लूटमार, तणावाचे वातावरण

अमरावती : पोलीसनामा आॅनलाइन – एका युवकाची जुन्या वादातून अतिशय निर्दयीपणे हत्या केल्याची घटना अमरावतीमधील परतवाडा येथे घडली होती. या घटनेचे तीव्र पडसाद दुसऱ्यादिवशी उमटले. संतप्त झालेल्या जमावाने परवाडा बाजारपेठेत दगडफेक आणि लूट सुरू केली, त्यामुळे परतवाडा-अचलपूर शहरात दिवसभर तणावाचे वातावरण होते. येथील लालपूल परिसरात अज्ञात मारेकऱ्यांनी सल्लू ऊर्फ सय्यद सलमान सय्यद रहमान (२७, रा. आझाद नगर, परतवाडा) या युवकावर तीक्ष्ण शस्त्रांनी अनेक वार करत हत्या केली होती.

संतापजनक… आजोबाचे कुकर्म लपविण्यासाठी नातीने ब्लेडने चिरला नवजात बाळाचा गळा 

याबाबत सविस्तर वृत्त असे की, आझाद नगराजवळील लाल पुलावरून सल्लू ऊर्फ सलमान हा एकटाच जात असताना आठ ते दहा हल्लेखोरांनी त्याला आडवून त्याच्यावर सपासप वार केले. त्याला जखमी अवस्थेत उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता उपचाराआधीच मृत्यू झाला. सल्लूच्या डोक्यावर तीक्ष्ण शस्त्रांनी अनेक वार करण्यात आले होते. या घटनेची माहिती मिळताच परवाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत परिसरातील तणावाचे वातावरण निवळले होते. पोलिसांनी प्राथमिक चौकशीनंतर एका संशयिताला रात्रीच ताब्यात घेतले. दरम्यान, या खूनप्रकरणातील अन्य आरोपी फरार झाले असून पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे.
मृत सलमानचे वडील वाहनचालक असून हत्येच्या घटनेनंतर आझाद नगर भागात तणाव निर्माण झाला. लोक मोठ्या संख्येने रस्त्यावर एकत्र झाले. आरोपींना अटक करावी, तोपर्यंत शवविच्छेदन होऊ देणार नाही, अशी भूमिका मृत सलमानच्या कुटुंबीयांनी घेतली. त्यानंतर राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी त्याच्या कुटुंबीयांची समजूत काढली. दुपारी शवविच्छेदन पार पडले.

मात्र, दुसऱ्या दिवशी पुन्हा संतप्त जमाव रस्त्यावर आला व आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी दुकाने बंद करण्याचे आवाहन आवाहन करू लागला. तर काही लोकांनी दगडफेक आणि लूटमार सुरू केली. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. संतप्त जमवाने केलेल्या दगडफेकीत आकाश आणि सुधीर श्रीवास्तव हे दोन दुकानदार जखमी झाले. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांची अतिरिक्त कुमक मागवण्यात आली होती. त्यानंतर स्थिती नियंत्रणात आली.